समाजजीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच खरे साहित्य” : – योगेश सोमण
“समाजजीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच खरे साहित्य” : – योगेश सोमण
निगडी (प्रतिनिधी): खऱ्या अर्थाने समाज माणसाला साहित्य शिकवतो. साहित्यिक समाज घडवीत नसतो, तर समाजच साहित्य घडवित असतो. लेखक हा स्वतःचा पहिला वाचक असतो, त्यामुळे त्याने सहजतेने लिहीत राहावे. साहित्यात कल्पनाविलासापेक्षा जीवनानुभवाला अधिक महत्त्व असून, समाजजीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच खरे साहित्य असते,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले.
निगडी-प्राधिकरण येथील स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृहात समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आणि संस्कार भारती (पिंपरी-चिंचवड) यांच्या वतीने आयोजित ‘साहित्यिक संवाद’ या उपक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश सोमण होते, तर समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, समरसता गीत आणि सुभाष चव्हाण यांनी केलेल्या मधुर शंखनादाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. यानंतर आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी व उज्वला केळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद आणि डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रातील प्रेरणादायी उताऱ्यांचे अभिवाचन केले.
तरुण पिढी आणि साहित्याची वाटचाल
संवाद साधताना योगेश सोमण पुढे म्हणाले की, “दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपण आपले उत्तम काम सुरू ठेवावे. साहित्यातून उपदेश न देता परिणाम साधता आला पाहिजे. मनात साठलेले चांगले अनुभव कृतीत आणणे म्हणजेच समरसता होय. तरुणाई पुस्तक वाचत नाही हा केवळ एक समज असून तेही वाचन करतात; मात्र तरुणाई नक्की काय वाचते, याचा विचार साहित्यिकांनी केला पाहिजे. साहित्याचा विकास होण्यासाठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे.”
‘पंच परिवर्तनाचा’ बहुमोल संदेश
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तना’वर आपले विचार मांडले. “आपण आपला देश नव्या पिढीला आवडेल आणि अभिमान वाटेल असा घडवूया,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
Vसाहित्यातील विविध प्रश्नांवर मंथन
या सत्रात नारायण देशपांडे, नितीन हिरवे आणि नीलिमा फाटक या साहित्यिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना योगेश सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली. यामध्ये:
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य वाढवणार का?
* दूरदर्शनवरील वाईट गोष्टींचा भडीमार कसा थांबवता येईल?
* विद्रोहाचे नकारात्मकतेकडे चाललेले टोकदार स्वरूप आणि लोहगड घटना, यावर फक्त व्यक्त होऊन थांबायचे का?
मसाप शाखा वाढीचा विचार आहे का?
यांसारख्या ज्वलंत विषयांवर चर्चा झाली.
मान्यवरांची मांदियाळी
या कार्यक्रमाला डॉ. गिरीश आफळे, रविकांत कळमकर, प्रा. तुकाराम पाटील, शोभा जोशी, राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, संदीप तापकीर, रमेश वाकनीस, विजय शेंडगे, पंजाबराव मोंढे, ह.भ.प. अशोक महाराज गोरे, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे, प्रदिप तळेकर, राजेंद्र देशपांडे, नीलिमा फाटक, राधाबाई वाघमारे, माधुरी विधाटे, कैलास भैरट, आनंदराव मुळुक, सुलभा सत्तुरवार, अश्विनी रानडे, वैशाली मोहिते, शरद काणेकर, रजनी अहेरराव, राजेश चौधरी, मीनाताई पोकरणा यांसह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व परिसरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन राऊत, नारायण देशपांडे, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे, निलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, सुरेश जोशी, श्रद्धा चटप आणि निलेश देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी तर आभार प्रदर्शन सुहास घुमरे यांनी केले. प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.



